
*“गावागावात सुविधा, हाच आमचा अजेंडा” – पालकमंत्री गुलाबराव पाटील*
जळगाव तालुक्यातील पाच गावांत कोट्यवधींच्या विकासकामांचा शुभारंभ व लोकार्पण !
*जळगाव प्रतिनिधी दि. १७ जानेवारी – विकास म्हणजे केवळ निधी मंजूर करणे नाही, तर तो प्रत्यक्ष गावाच्या रस्त्यांवर, शाळांच्या खोल्यांत, पाण्याच्या नळांत आणि स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यांपर्यंत दिसला पाहिजे. म्हणूनच योजना कागदावर न ठेवता जमिनीवर उतरवण्यावर आमचा ठाम भर असून ‘गावागावात सुविधा, हाच आमचा अजेंडा’ आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव तालुक्यातील विविध गावांतील विकासकामांच्या भूमिपूजन व लोकार्पणप्रसंगी केले.*
जळगाव तालुक्यातील गाढोदा, पडसोद, भोकर, किनोद व कठोरा या पाच गावांमध्ये एकाच दिवशी रस्ते, पाणीपुरवठा, शैक्षणिक सुविधा, स्मशानभूमी, ग्रामपंचायत इमारती तसेच पर्यटन विकासाशी संबंधित कोट्यवधी रुपयांच्या कामांना सुरुवात झाली. या कामांमुळे केवळ भौतिक सुविधा वाढणार नसून ग्रामीण जीवनमानात ठोस आणि दीर्घकालीन बदल घडणार असल्याची भावना ग्रामस्थांतून व्यक्त होत होती.
पालकमंत्री गुलाबराव पाटील पुढे म्हणाले, ग्रामीण भाग सक्षम झाला तरच शहरांवरील ताण कमी होतो आणि राज्याची प्रगती वेगाने होते. त्यामुळे शेती, सिंचन, शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधा या सर्व घटकांवर समतोल पद्धतीने निधी देण्याचे धोरण आम्ही राबवत आहोत. विकास हा सर्वसमावेशक आणि टिकाऊ असलाच पाहिजे, हाच आमचा ठाम दृष्टिकोन आहे.
*पर्यटन विकासाला चालना*
तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत पडसोद येथे सुमारे १० कोटी रुपयांच्या पर्यटन विकास कामांना सुरुवात झाल्याने भविष्यात धार्मिक पर्यटनातून स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. यासोबतच ग्रामपंचायत इमारती, संरक्षण भिंती, दलित वस्तीतील अंतर्गत रस्ते व पेव्हिंग ब्लॉकसारखी कामे सामाजिक समतेच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहेत.
*शिक्षण व पाणीपुरवठ्यावर भर*
किनोद व कठोरा येथे शाळा खोल्या, संरक्षण भिंती आणि पाणीपुरवठा योजनांमुळे विद्यार्थ्यांना सुरक्षित व सुविधा-संपन्न वातावरण मिळणार असून “घराघरात नळाद्वारे पाणी आणि मुलांसाठी दर्जेदार शिक्षण हीच खरी सामाजिक गुंतवणूक आहे,” असेही पालकमंत्र्यांनी नमूद केले.
*गावा-गावात उत्सवाचे वातावरण*
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या आगमनावेळी प्रत्येक गावात ढोल-ताशे, फटाक्यांची आतषबाजी व नागरिकांच्या गर्दीतून उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. विकासकामांच्या शुभारंभामुळे गावकऱ्यांमध्ये समाधान, विश्वास आणि पुढील प्रगतीबाबत आशेचे वातावरण निर्माण झाले होते.
कार्यक्रमात जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी मतदारसंघातील सुरू असलेल्या व मंजूर विकासकामांचा आढावा सादर केला. सूत्रसंचालन जिल्हा दुध संघाचे संचालक रमेश आप्पा पाटील यांनी केले तर आभार तालुकाप्रमुख शिवराज पाटील यांनी मानले.
*यांची होती प्रमुख उपस्थिती*
प्रत्येक गावातील कार्यक्रमाप्र संगी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, पवन सोनवणे, माजी सभापती राजेंद्र चव्हाण, नंदलाल पाटील, जनाआप्पा पाटील (कोळी), तालुकाप्रमुख शिवराज पाटील, गोपाल जिभाऊ, तसेच संबंधित भागातील सरपंच योगराज पाटील, सतीलाल पाटील, संदीप पाटील, भिला सोनवणे, भूषण सूर्यवंशी व पंकज पाटील या सरपंचांसह तहसीलदार शितल राजपूत, पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील, मंडल अधिकारी आशिष वाघ, ग्रामसेवक संदीप पाटील, भाजपाचे मिलिंद चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भूषण पाटील, विभागप्रमुख गजानन सोनवणे, डॉ. कमलाकर पाटील, बालाशेठ लाठी, महेश चौधरी, डॉ. सत्वशील पाटील, उपतालुकाप्रमुख प्रमोद सोनवणे, अरविंद सपकाळे, मार्केटचे माजी संचालक शांताराम सोनवणे, मुरलीधर पाटील, बाळू अहिरे, प्रल्हाद पाटील, किशोर पाटील, तसेच उपसरपंच, विकास सोसायटीचे चेअरमन, सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, संचालक, शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.