
*पारंपारिक लोककला व संस्कृती टिकवण्यासाठी कलाकार जपला पाहिजे” – पालकमंत्री गुलाबराव पाटील*
गर्जा महाराष्ट्र माझा कार्यक्रमाद्वारे विविध लोककलांचा व संस्कृतीचा जागर
*जळगाव, दि. १ मे (प्रतिनिधी) – “गर्जा महाराष्ट्र माझा” हा शासनाचा जिल्हास्तरीय उपक्रम केवळ सांस्कृतिक कार्यक्रम नसून महाराष्ट्राच्या अस्मिता, परंपरा आणि लोककलेचा जागर करणारा उत्सव आहे. लोककला आणि कलावंतांच्या जतनासाठी शासन कटिबद्ध असून, संस्कृती टिकवायची असेल तर कलाकार जपलाच पाहिजे, असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. लोककला ही माणसाला माणसाशी जोडणारी सशक्त शक्ती असून, लोककलावंतांच्या सन्मान आणि उन्नतीसाठी शासन सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.*
पुढे बोलताना पालकमंत्री म्हणाले की, शाहीर अण्णा भाऊ साठे शाहीर अमर शेख शाहीर आत्माराम पाटील शाहीर गव्हाणकर यांसारख्या लोकशाहीरांनी आपल्या कलेतून समाजाला दिशा देत जनजागृती घडवली. हीच परंपरा पुढे नेण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे. *“गर्जा महाराष्ट्र माझा”* सारख्या उपक्रमांमधून आपल्या संस्कृतीचा अभिमान जपत, हा अमूल्य वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प करूया, असे आवाहनही त्यांनी केले.
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या वतीने महाराष्ट्र दिनानिमित्त ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन कान्ह ललित कला केंद्र, नाट्य सभागृह, एकलव्य क्रीडा संकुल येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी सिने व नाट्य अभिनेते ‘हास्य जत्रा’ फेम हेमंत पाटील, ज्येष्ठ शाहीर शिवाजीराव पाटील, के.सी.ई. सोसायटीचे शशीकांत वढोदकर, प्रा. डॉ. जयेंद्र लेकुरवाळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
महाराष्ट्राला समृद्ध लोककला व लोकसंस्कृतीचा वारसा लाभलेला असला, तरी आजच्या इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांच्या युगात पारंपरिक कला लोप पावत आहेत. या कलांचे जतन व संवर्धन व्हावे, या उद्देशाने शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत राज्यभर सातत्याने विविध कार्यक्रम राबविले जात असल्याचे मत यावेळी पालकमंत्री पाटील यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमादरम्यान खान्देशातील विविध पारंपारिक लोककलेत कार्यरत असलेल्या लोककलावंतांचा सन्मान पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमात ‘लोकयात्रा कलामंच’च्या कलाकारांनी विविध लोककला, नृत्य आणि पारंपरिक सादरीकरणांद्वारे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा रंगतदार आविष्कार सादर केला. तसेच खान्देश लोककला विकास परिषदेच्या वतीने शाहीर शिवाजीराव पाटील व सहकाऱ्यांनी ‘गौरव महाराष्ट्राचा’ हा शाहिरी पोवाडा सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम समन्वयक विनोद ढगे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सचिन महाजन यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मोहित पाटील, अवधूत दलाल, देवराज बोरसे, आकाश भावसार, पंकज बारी, राहुल पवार आणि ईश्वर नाथबुवा यांनी परिश्रम घेतले.