
*RTE मधील १ किमी हवाई अंतराची जाचक अट हायकोर्टाकडून रद्द!*
*_सामाजिक कार्यकर्ते किरण माळी यांच्या निवेदनासह संघर्षाला मोठे यश; लाखो विद्यार्थ्यांना दिलासा._*
पाळधी /धरणगाव (प्रतिनिधी):
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) २५% मोफत प्रवेश प्रक्रियेत राज्य सरकारने लादलेली शाळेपासून घराच्या १ किलोमीटर हवाई अंतराची जाचक अट नागपूर खंडपीठाने रद्द ठरवली आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांच्या मोफत शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला असून, सामाजिक कार्यकर्ते किरण आनंदा माळी यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे.
*काय होता नेमका वाद*
राज्य सरकारने यावर्षी आर.टी.ई. नियमांत बदल करून घरापासून शाळेचे अंतर ३ किलोमीटरऐवजी १ किलोमीटर केले होते. तसेच नोंदणीकृत भाडेकराराची सक्ती केली होती. या अटींमुळे अनेक ग्रामीण आणि शहरातील गरीब मुले प्रवेशापासून वंचित राहत होती. या अन्यायाविरोधात सामाजिक कार्यकर्ते किरण माळी यांनी महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री ना. दादा भुसे, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना वारंवार निवेदने देऊन ही अट रद्द करण्याची मागणी लावून धरली होती.
१० पेक्षा अधिक वृत्तपत्रांनी घेतली होती दखल
या विषयाचे गांभीर्य ओळखून पुण्यनगरी, सकाळ, दिव्य मराठी, सनातन प्रभात, देशोन्नती यांसह १० पेक्षा अधिक प्रमुख वृत्तपत्रांनी किरण माळी यांच्या मागणीची दखल घेत वृत्त प्रसिद्ध केले होते. सोशल मीडियावरही त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सरकारला जाब विचारला होता. अखेर न्यायदेवतेने या प्रकरणाची गंभीर दखल घेत १ किमीची अट रद्द करून गरिबांच्या मुलांना न्याय दिला आहे.
_”हा विजय माझा एकट्याचा नसून राज्यातील त्या प्रत्येक गरीब विद्यार्थ्याचा आणि पालकाचा आहे, ज्यांच्या शिक्षणासाठी आम्ही लढा दिला._ _१० मार्च ही अंतिम मुदत असताना न्यायालयाने दिलेला हा निर्णय लोकशाहीचा विजय आहे.”_
— किरण आनंदा माळी (सामाजिक कार्यकर्ते)
आता या निर्णयामुळे आर.टी.ई. प्रवेशासाठी पुन्हा एकदा ३ किलोमीटर अंतराची मर्यादा लागू होणार असून, यामुळे पालकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.